तबलिगी जमातच्या 'मरकज'मधून आलेले अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण करोनाग्रस्तांच्या यादीत तबलिगी व त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या बाबतीत कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. कुठलाही धार्मिक अभिनिवेष न बाळगता आपण या संदर्भातील कारवाई करावी,' अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
देशातील लॉकडाऊनला १४ दिवस पूर्ण होत असताना आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी काही गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या आहेत. 'केंद्र सरकारनं तीन महिन्याचं धान्य रेशन दुकानांतून मोफत देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यातील ९० टक्के कोटा राज्याला मिळाला देखील आहे. मात्र, त्याचं अद्याप वितरण झालेलं नाही. देशातील १६ राज्यांनी रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांनाही धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही असा निर्णय घेणं शक्य आहे, असं फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे
तबलिगींबाबत कठोर पावलं उचला; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र